Loading
शेतकरी सुखावला, मात्र जनजीवन विस्कळीत
मुंबई,२०जुलै मुंबई आणि आसपासच्या भागात पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले मात्र राज्यातील शेतकरी सुखावला आहे. मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे मध्य, पश्चिम, आणि हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन सेवा विलंबाने धावत होत्या. मध्य रेल्वे मार्गावरील गाड्या १० ते १५ मिनिटे, पश्चिम रेल्वेवरील गाड्या ५ ते १० मिनिटे, आणि हार्बर मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे समर आले. अंधेरी सबवे, भांडुप एलबीएस मार्ग आणि ठाणे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. अंधेरी, कांदिवली, मालाड, बोरिवली, दहिसर आणि गोरेगाव या भागातही जोरदार पाऊस सुरू होता.हवामान खात्याने पुढील काही तासांमध्ये मुंबईत आणखी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने पाणी उपसण्यासाठी पंप लावले होते. तरीही, पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गांवर वाहतूक कोंडी राहिली, त्यामुळे नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागला.
ठाणे, कल्याण, डोंबिवली, आणि उल्हासनगर परिसरातही जोरदार पाऊस झाला. ठाण्यात पहाटे ४: ३०पासून ८:३० वाजेपर्यंत ७६.७मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे ठाण्यातील वंदना डेपो परिसरात पाणी साचले. भिवंडी मार्केट परिसरात पाणी तुंबल्याने गुडगाभर पाणी साचले.मुंबईच्या उपनगरांसोबतच रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. रोहा येथे कुंडलिका नदी दुथडी भरून वाहत होती, आणि किनाऱ्यावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
हवामान खात्याने कोकणातील रत्नागिरी आणि विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, आणि गडचिरोली जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला होता. तसेच ठाणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, आणि नांदेड जिल्ह्यांनाही अलर्ट देण्यात आला होता. नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली. नागपुरातील विमानतळ परिसरातही पाणी साचायला सुरुवात झाली होती. संपूर्ण मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकतेनुसारच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले. रेल्वे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. ट्रॅकवर पाणी साचू नये म्हणून उपाययोजना सुरू ठेवण्यात आली.